नांदवळमध्ये गोठ्यातील 13 गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनस्थळाची पाहणी

0
908
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून या काळात जनावरांची देखील काळजी पशुपालक शेतकरी घेत असताना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात तब्बल १३ गायी मृत्युमुखी पडण्याची घटना घडली आहे. तालुकयातील नांदवळ येथे एका शेतकर्‍याच्या 13 गायींचा 8 दिवसांत मृत्यू झाला असून पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी नुकतीच भेट देऊन पाहणी केली आहे. गायींचे शवविच्छेदन करून रक्तासह अन्य नमुने तपासणीसाठी पुणे व हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुकयातील नांदवळ येथील शेतकरी अजिज महमद शेख हे गेली अनेक वर्षांपासून पशुपालन करतात. त्यांचा नांदवळ येथे जनावरांचा गोठा देखील आहे. त्यांच्या गोठयामध्ये एकूण 29 जनावरे आहेत. दि. 25 जूनपासून अचानक गायींची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्यांनी तत्काळ खासगी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत गायीवर उपचार सुरू केले. मात्र, 8 दिवसांत 13 गायींचा मृत्यू झाला.

एकापाठोपाठ एक अशा प्रकारे १३ गायीचा मृत्यू झाल्याची माहिती पशु संवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील समजली. गायीच्या मृत्यूची माहिती समजताच पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, पुणे येथील प्रयोगशाळेचे जॉईंट कमिशनर डॉ. हलसुरे, उपायुक्त डॉ. लहाने, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भिसे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळास भेट दिली.

नांदवळ या ठिकाणी गायींच्या मृत्यूनंतर पशुपालकांमध्ये एक प्रकारे चिंतेचे वातावरण पसरले असून या गायीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे? याचा तपास वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. गायींचे शवविच्छेदन करून रक्तासह अन्य नमुने तपासणीसाठी पुणे व हिस्सार येथील प्रयोगशाळेत पाठले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच गायींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.