सातारा प्रतिनिधी । वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते किरण माने यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सुरू असते. सामाजिक, राजकीय परिस्थितीवर ते व्यक्त होत असतात. मूळचे ते सातारा जिल्ह्यातील. आषाढ वारीबाबत अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ‘वारी’ ही लै नादखुळा गोष्ट आहे. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाही, असे माने यांनी पोस्टद्वारे म्हण्टले आहे.
किरण माने यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, …याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लिम बांधवांकडनं आपल्या वारकर्यांना जेवण दिलं जातं.
https://www.facebook.com/share/p/16d2yzoozY
…विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करतात !! एरवी सहज एकनाथांच्या दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येतात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.
संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना काहीतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला… तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुंकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा प्रेमाचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं आहे…, असे किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.