सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक अशी जुनी आणि जीर्ण झालेली दगडी बांधकाम करण्यात आलेली पूल आहेत. त्या पुलाची अवस्था खूप गंभीर बनली आहे. पावसाळ्यात नदीतीळ पाणीपातळी वाढल्यानंतर असे पूल पाण्याखाली जातात तरी देखील त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाते. असाच एक पुल धोकादायक बनला आहे. पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील वीर धरणाखालून वाहणार्या निरा नदीवरील पूल सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. सन 1958 मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाला तब्बल 65 वर्षे पूर्ण झाली असून, आजपर्यंत एकदाही त्याचे ऑडिट, तपासणी अथवा डागडुजी करण्यात आलेली नाही. हा पूल पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमारेषा दर्शवितो. पुलाच्या अलीकडे पुणे, तर पलीकडे सातारा जिल्हा आहे.
वर्षभर या पुलावरून अवजड व सामान्य वाहनांची वाहतूक सुरू असते. तब्बल 65 वर्षे पूर्ण झालेला हा जुना पूल नीरा नदीपात्रापासून अतिशय कमी उंचीवर असून, दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे नाहीत तसेच दिशादर्शक फलक, रेडियम पट्ट्या नसल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पूल पाण्याखाली गेला असताना अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. अनेकदा वाहने थेट नदीपात्रात कोसळल्याचे प्रकार घडले आहेत. वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर काही काळ पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो.
ज्यावेळी धरणाचे काम सुरू होते त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता. धरण प्रशासनाच्या मालकीत असलेला रस्ता आणि पूल सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सार्वजनिक वापरासाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, देखभालीबाबत विभागाचे दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवते.