सातारा प्रतिनिधी | संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पाडेगाव, लोणंद (ता. खंडाळा) येथे प्रवेश करेल. जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांचं आज दुपारी 1 वाजता निरा नदीत पारंपरिक स्नान सोहळा पार पाडणार आहे. त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करून ३० जून रोजी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहे. पालखी सोहळा हा निरा-लोणंद-फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार आहे.
माऊलीच्या पादुकांच्या स्नानानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. यानंतर पालखीची सुरक्षा जबाबदारी पुणे पोलिसांकडून सातारा पोलिसांकडे औपचारिकपणे हस्तांतरित केली जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असून, दोन्ही जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजचा मुक्काम लोणंद या ठिकाणी असून, तेथे पालखी रात्री विसावणार आहे. लाखो वारकरी भक्त लोणंद येथे पोहोचले आहेत आणि वारीचे वातावरण हरिनामाच्या घोषाने भक्तिमय झाले आहे. वरील सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासाठी स्थानिक प्रशासन, स्वयंसेवक आणि पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे.