सातारा प्रतिनिधी । घरच्यांच्या विरोधात प्रेम विवाह केल्यानंतर काय काय विपरीत घडते या गोष्टी आपण ऐकल्या व पहिल्या देखील असतील. घरातील मुलीने पळून जाऊन विवाह केल्यानंतर तिची आई किव्हा वडील यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. पुढे ते सावरतात देखील मात्र, काहींचे आई किव्हा वडील खूप टोकाचा निर्णय घेतात. अशीच घटना सातारा जिल्ह्यातील एका गावात घडली. एका २३ वर्षीय उच्च शिक्षित तरुणीने गावातील एका तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. या नैराश्यातून मुलीच्या आईने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील एका गावात मंगळवारी सकाळी घडल्याचे समाेर आले.
सातारा तालुक्यातील एकाच गावामध्ये राहणाऱ्या तरुण, तरुणीचे एकमेकांवर अनेक वर्षांपासून प्रेम होते. मात्र, घरातील लोकांचा लग्नाला विरोध होईल या भीतीने दोघांनी रविवार, दि. २२ राेजी घरातून पलायन केले. त्यानंतर, एका ठिकाणी जाऊन त्यांनी रजिस्टर लग्न केले. या प्रकारानंतर मुलीच्या आई-वडिलांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात येऊन मुलगी पळून गेल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनीही तातडीने दोघांचाही शोध घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्यांनी रजिस्टर लग्न केले असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलगा आणि मुलीच्या कुटुंबातील लाेकांना पोलिस ठाण्यात बोलावले. दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्या इच्छेने त्यांनी लग्न केले आहे. त्यामुळे दोघांना सुखात संसार करू द्या, आडकाठी करू नका, असा सल्ला पोलिसांनी दोन्ही कुटुंब प्रमुखांना दिला. मुलगी घरातून पळून गेल्याने तिच्या आईने मनाला फार लावून घेतले होते.
दोन दिवसांतच मुलगी परत पोलिस ठाण्यात आली. मात्र, येताना दोघे लग्न करून आले हे जेव्हा मुलीच्या आईला समजले, तेव्हा तिला जबर मानसिक धक्का बसला. मुलीला पाहण्यासाठीही आई पोलिस ठाण्यात आली नाही. घरातले लोक पोलिस ठाण्यातून घरी जाईपर्यंत मुलीच्या आईने नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले होते. तिला तातडीने साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी मुलीच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.