सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून अनेक सोयी सुविधा देखील उभारण्यात आलेल्या आहेत. यावर्षी प्रशासनाकडून पालखी सोहळ्यात साक्षरता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक दिंडीत भेटी देऊन निरक्षर वारकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व निरक्षर लोकांसाठी विशेष साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे.
जीवनात शिक्षणाचे महत्त्व तत्कालीन काळापासून अनेक संतांनी विविध अभंगांद्वारे पटवून दिले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जपत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या पालखी सोहळ्यात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रचार व प्रसार मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या नियोजनाची बैठक लोणंद येथील मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, फलटण गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, प्राचार्य चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
यावेळी “वारकऱ्यांना सेवा देणे हीच आपली या पालखी सोहळ्यातील ईश्वरसेवा मानून आनंदाने सेवा करावी. पालखीतील वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व काय आहे, हे समजावून सांगण्यासाठी तसेच शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या पालखी सोहळ्यात सर्व शिक्षकांनी सेवा करावी, असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी व्यक्त केले.