सातारा प्रतिनिधी | पावसाळा सुरु झाला की साथरोग पसरण्यास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक आजारामुळे दवाखाने देखील फुल्ल होतात. सातारा जिल्ह्यात सातारा व कोरेगावमध्ये सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. सध्या 55 जण डेंग्यूने रुग्ण असून त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. मात्र डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून गावोगावी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
याबाबत आरोग्य विभागाकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सध्या डेंग्यूचे 55, हिवतापचे 33, चिकनगुण्याचे 17 रुग्ण आहेत. ज्या ठिकाणी डेंग्यूसह अन्य रुग्ण सापडले आहेत तेथील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या मदतीने धूर फवारणी करण्यात येत आहेत. तसेच घरोघरी हिवताप कार्यालयामार्फत सर्व्हेही करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे डासाच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू व चिकुनगुन्याचे रुग्ण आढळून येत आहेत. पावसाळ्यामध्ये डासांचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते. पाऊस पडला की, वातावरणात आर्द्रता निर्माण होते. ते हवामान डासांसाठी पोषक असते. त्यामुळे डासांची अधिक उत्पती होते. डास निर्माण झालेत की, अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपाय आहेत.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. पाणी साचल्यास लगेच त्याची योग्य विल्हेवाट लावावी. त्याचबरोबर डासांची निर्मिती ही फक्त दूषित पाण्यातच होते असे नाही. स्वच्छ पाण्यात सुद्धा डासांची निर्मिती होऊ शकते. त्यासाठी गप्पी मासे आपण त्या पाण्यात सोडू शकतो. मासे त्यातील डासांची अंडी खाऊन नाहीशी करतील आणि डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
6 महिन्यात 1 हजार 421 जणांच्या रक्त नमुने तपासणी
सातारा जिल्ह्यात जानेवारी ते जून दरम्यान 1 हजार 421 जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागामार्फत घेण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 402 जणांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात हिवतापांचे 33 रुग्ण, डेंग्यूचे 77 तर, चिकुनगुन्याचे 17 रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागामार्फत संबंधित ठिकाणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच रुग्णावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.
डेंग्यूची लक्षणे…
अचानक थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, हाडं, सांध्यामध्ये वेदना, मळमळ, अंगावर सूज व चट्टे येणे, तापासोबतच रक्तस्त्राव होण्याचा धोका, शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यामधून रक्तस्त्राव, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणे, सतत तहान लागणे, अशक्तपणा, गंभीर स्थितीत रुग्णांच्या मेंदू, फुफ्फुसं किंवा किडणीवर परिणाम आदी लक्षणे आढळून येतात.