खंडाळा-शिरोळ मार्गाचे काम रखडले’; शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा

0
386
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुख्य महामार्गावर व अंतर्गत मार्गावर रस्त्यांची कामे केली जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण आणि सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांला जोडणारा खंडाळा- कोरेगाव- रहिमतपूर- कराड – सांगली- शिरोळ या राज्य मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराकाडून अत्यंत संथ गतीने केले जात असल्यामुळे या मार्गाचे काम दिवसेंदिवस रखडत चालले आहे. या रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा, आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासह राज्यभरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केली. या कामांसाठी खासगी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, निवडणूक काळात काही कंत्राटदारांनी कामे न करता केवळ ‘हॅम’ योजनेच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षातील आमदारांना खूश करण्यासाठी सुमारे २०० ते ५०० कोटी रुपयांची कामे दाखवली. वास्तविक कामाच्या गतीचा आणि दर्जाचा विचार केला, तर आजही अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

खंडाळा ते शिरोळ राज्य मार्गाचे कोरेगाव ते पिंपोडे खुर्द दोस्ती ढाबा या भागातील रस्त्याचे काम मंजूर केले होते. मोठ्या दिमाखात भूमिपूजन करून काही महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अनेक महिने उलटून गेले, तरी काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सुरुवातीला केवळ दोन ते तीन किलोमीटरचा टप्पा घेण्याऐवजी संपूर्ण रस्ता एकाच वेळी खोदण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तज्ज्ञ अभियंते आणि हुशार ठेकेदार यांच्या या अलौकिक कामगिरीमुळे वाहनधारक व नागरिकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची ही अवस्था अधिकच गंभीर बनली आहे. खंडाळा- शिरोळ राज्य मार्गाचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पदाधीकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे.