सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात 26 जून रोजी आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पूर्णपणे सज्ज झाले आहे. पालखी सोहळ्याच्या कालावधीत, म्हणजेच 26 ते 29 जून अखेर, वारकर्यांच्या सेवेसाठी विविध मार्गांवर एकूण 96 विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील विविध आगारांमधून या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये फलटण आगारातून सर्वाधिक 28 बसेस, तर सातारा येथून 12, वाई आणि दहिवडी प्रत्येकी 10, पारगाव खंडाळा 10 आणि वडूज येथून 8 बसेस वारकर्यांच्या सेवेत असतील. याव्यतिरिक्त कराड, कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर आणि मेढा आगारातूनही बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सातारा-लोणंद मार्गावर 28 बसेस, तर लोणंद-फलटण-पंढरपूर-शिंगणापूर मार्गावर 24 बसेस धावतील.
पालखी मार्गावर कापडगाव फाटा, गोटे माळ, बिरोबा वस्ती येथे तात्पुरत्या शेडची उभारणी करण्यात आली असून, तेथे वाहतूक निरीक्षक व नियंत्रकांची नियुक्ती केली आहे. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरडगाव मुक्कामावेळी तरडगाव-फलटण मार्गावर 10 आणि तरडगाव-लोणंद मार्गावर 5 जादा बसेस, फलटण मुक्कामावेळी (दि. 28) फलटण-सातारा मार्गावर 30, फलटण-शिंगणापूर-पंढरपूर मार्गावर 20, तर बरड मुक्कामावेळी (दि. 29) फलटण-बरड मार्गावर 10 जादा बसेस सोडण्यात येतील. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड येथे अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.