पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीतील पर्यटन ‘या’ तारखेपर्यंत बंद

0
285
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली येथील जंगल सफारी पर्यटकांसाठी पावसाळ्याच्या कालावधीत १५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाळ्याच्या कालावधीमध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील पर्यटन बंद असते. या वर्षाचा पर्यटन हंगाम १४ जून रोजी समाप्त झाला. त्यामुळे नेहमीप्रमाणे पावसाळ्यात चार महिन्यांच्या कालावधीत चांदोलीतील पर्यटन बंद राहणार आहे. पावसाळ्यात जंगलातील कच्चे रस्ते आणि नाले यामुळे वाहनांच्या रहदारीस अडथळा निर्माण होतो.

अशा वेळी कच्चे रस्ते आणखी खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात राष्ट्रीय उद्याने बंद ठेवण्यात येतात. वाहनांमुळे जंगलातील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळ्यात लहान जीव, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्यजीवांचा प्रजननाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, यासाठीसुद्धा पर्यटन बंद ठेवले जाते.

महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रामधील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये निर्सग पर्यटनासाठी सात विभाग असून, दरवर्षी पर्यटन हंगामामध्ये राज्यातील विविध ठिकाणांवरून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येतात.

पर्यटन हंगामामध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात पर्यटकांसाठी जंगल सफारी, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण, गडकिल्ले, परिसरातील निसर्गसौंदर्य, वृक्षसंपदा आणि विविध वन्यप्राणी पाहण्याची संधी उपलब्ध असते. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये चांदोलीतील पर्यटन बंद राहणार असल्याची नोंद सर्व पर्यटकांनी घ्यावी.