कराड प्रतिनिधी | पावसाळा आला की पावसासोबत रोगराई देखील येते. खास करून पावसाचे पाणी साचल्यानंतर तसेच दुर्गंधीमुळे अनेक साथरोग पसरतात. अशाच कावीळ साथ रोगाची लागण कराड तालुक्यातील शामगाव या गावातील नागरिकांना झाली आहे. नळपाणी पुरवठा योजना आणि विहिरीतील दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. गावात पोटदुखी, ताप, थंडी, कणकण, जुलाब यासारख्या आजारांसह कावीळचे सहा रुग्ण आढळले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कराड तालुक्यातील शामगाव येथील काही ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने त्याचा त्रास झाला आहे. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी गावातील पाणी, तसेच रुग्णांची तपासणी केली. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जरिना नदाफ, ग्रामपंचायत अधिकारी एन. एस. देशमुख, शिवाजी पाटील, आरोग्य सहाय्यक अरुण साळुंखे, नारायण साळुंखे उपस्थित होते.
तपासणीत पाण्याचा रंग पिवळसर, गढूळ आणि घाणमिश्रित असल्याचे आढळले. गावाची नळपाणी पुरवठा योजना बोंबाळवाडीच्या तलावाजवळील विहिरीवर अवलंबून आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने गळतीमुळे पावसाचे पाणी मिसळून दूषित होत आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर संकट उद्भवण्याची भीती आहे.