सातारा प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे पर्यटकांच्या वजनाने पूल कोसळून पर्यटक इंद्रायणी पात्रात वाहून गेल्याची दुर्घटना घडली. यामुळे महाराष्ट्रातील जुन्या फुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातारा शहराजवळ कृष्णा नदीच्या पुलाला ११० वर्षे पूर्ण होऊनही त्याला अद्याप पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. आतापर्यंत प्रशासनाकडून टेंडर झाले, निधी मंजूर झाला. मात्र, पर्यायी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
कोरेगावच्या दिशेने जाताना कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या डाव्या बाजूने नव्या पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. या कामासाठी आठ कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये फक्त पुलाच्या पिचिंगचे काम प्राथमिक टप्प्यामध्ये आहे आणि येथे एकच पिलर उभा करण्यात आला आहे. या गतीने पुलाचे पुढचे काम पूर्ण होण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
ब्रिटिशकालीन पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्याची माहिती ठेकेदार कंपनीने महाराष्ट्र शासनाला कळवली आहे. या पुलाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो. हा पूल मोडकळीला आल्यास जिल्ह्यातील पूर्व भागाचा संपर्क तुटू शकतो. यामुळे होणारी मानवीहानी आणि आर्थिक नुकसान कल्पना करण्याच्या पलिकडची आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीने यावर उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.