कराड प्रतिनिधी । कराड शहरात आजही अनेक वर्षापासून धोकादायक इमारतींमध्ये लोक आपला जीव मुठीत धरून राहत आहेत. दरम्यान, कराड शहरामध्ये सध्या पालिकेकडे नोंद असलेल्या एकूण इमारतींपैकी 67 इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. नगरपालिकेने शहरातील या धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारती उतरवण्याबाबत नोटीस दिली आहे. मात्र, मालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने भविष्यात या इमारती कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पावसाळा जवळ आला की, जीर्ण झालेल्या व तडे गेलेल्या इमारती ढासळून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होण्याची शक्यता असते. अशा धोकादायक इमारती उतरवून घेणे महत्वाचे असते.
शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की केला जातो. त्यानुसार यंदाही पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 67 इमारती धोकादायक इमारती आढळून आल्या. त्यावेळी संबंधीतांना नुसत्या नोटीसा देण्यात आल्या. पावसाळ्यामध्ये धोकादायक, जीर्ण झालेल्या, भेगा पडलेल्या इमारती कोसळून जिवीत हानी होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारतींचे सर्व्हेक्षण करणे गरजेचे असते.
एकंदरीत पाहता कराड शहरात पाच वर्षातील धोकादायक इमारतींचा एकदा पाहिल्यास तो वाढलेला असल्याचे दिसून येते. शहरातील धोकादायक इमारतींच्या समस्यांबरोबर अनधिकृत बांधकामे, जागेचे अतिक्रमण, पालिकेचे नियम डावलून बांधण्यात आलेल्या इमारती अशा अनेक समस्या आहेत.
मागील वर्षी 18 नवीन आढळल्या होत्या धोकादायक इमारती
मागील वर्षी कराड शहरातील धोकादायक इमारतीचा पालिकेच्या वतीने सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेत शहरात तब्बल ६९ इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्या आहेत. यामध्ये यावर्षी नव्याने १८ धोकादायक इमारती आढळल्या. या इमारत मालकांना पालिकेने नोटीस देखील पाठवल्या होत्या.
धोकादायक इमारती म्हणजे…
पालिकेकडून ठरविण्यात आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये ४० ते ५० वर्षापूर्वी बांधकाम केलेल्या व जीर्ण झालेल्या इमारत, तिच्या भिंतींला तडे गेले असल्यास, इमारतींच्या लाकडांना वाळवी लागली असल्यास, पांढºया मातीपासून व बारीक दगडापासून बांधण्यात आलेली कौलारू घरे, वाडे यांचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये केला जातो.
कराडात अनेक इमारती रस्त्याकडेला
कराड शहरात अनेक दोन तसेच तीनमजली इमारतींची संख्या आहे. या इमारतींमध्ये जुन्या दगडी, माती तसेच लाकडाच्या साह्याने बांधलेल्या इमारती आहेत. त्या इमारतींपैकी काही इमारती या मुख्यरस्त्यासह अंतर्गत रस्त्याकडेला आहेत. त्या जर कोसळल्या तर मोठ्या प्रमाणात दुर्घटनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.