सातारा प्रतिनिधी | राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्यातील आपल्या दरे गावी मुक्कामी आहेत. ते मुक्कामी असताना मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा जूना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून पूल दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दरे (ता. महाबळेश्वर) येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मावळ तालुक्यातील कुंडमळा हे एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे. त्या ठिकाणच्या इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली आहे. घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.”
38 लोकांना एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. त्यांना स्थानिक लोक ही मदत करत आहेत, बचाव कार्य सुरू आहे. पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा लोक जखमी असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जखमींवर उपचार करून त्यांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे लोक दुर्घटनेत सापडले आहेत, त्यांना लवकरात लवकर शोधून काढण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. “इंद्रायणी नदीवरील पुलांसारख्या सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. तसंच या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,” असंही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.