सातारा प्रतिनिधी | शिक्षणाच्या बाजारूपणात संपुष्टात येण्याच्या मार्गावरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थ पुढाकार घेताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक गावानेही शाळा वाचवण्यासाठी आता पुढाकार घेतला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर या घरपट्टीच्या रकमेची तरतूद आपल्या मानधनातून करणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे. गावाची शाळा वाचविण्यासाठी असा उपक्रम राबवणारे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे पहिलेच गाव ठरले आहे.
सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुकची ग्रामसभा नुकतीच उपसरपंच संजय माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुरुदत्त कुलकर्णी, डॉ. राजेंद्र अवघडे, ग्रामपंचायत अधिकारी अमोल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामसभेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या घटत चालली असल्याबाबत चर्चा झाली. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला फडतरे यांचे पती संदीप फडतरे यांनी मांडला.यावर सर्वच उपस्थितांनी तत्काळ संमती दर्शवत याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला.
१०० टक्के घरपट्टी माफीचा निर्णय
सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीकडे १९२८ नोंदणीकृत मिळकतधारक आहेत. श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर असलेल्या तीर्थक्षेत्राच्या या स्थानी मोठ्या प्रमाणात भाविकांची रेलचेल आहे. त्यामुळे गावात योजना राबवताना ग्रामपंचायतीला मोठी कसरत करावी लागते, तरीही ग्रामस्थांनी एकी दाखवत जिल्हा परिषदेच्या शाळेचं पुनर्वसन, संवर्धन व्हावं आणि दर्जेदार शिक्षणाच्या जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या उद्देशानं इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शंभर टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला.
घरपट्टी माफ करण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय
तत्कालीन ग्रामस्थांच्या सहकार्यातून २७ मार्च १९०३ मध्ये गोंदवले बुद्रुकमध्ये पहिली शाळा सुरू झाली. या शाळेला सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे; परंतु गेल्या काही वर्षांत इंग्रजी व खासगी शाळांचे पेव फुटल्याने या शाळेच्या विद्यार्थिसंख्येवर मोठा परिणाम होत गेला. गुणवत्ता असणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने आणि शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामसभेत हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या शाळा नं. १ व शाळा नं. २, तसेच कचरेवडी व कवटवस्ती येथील शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांचा घरपट्टी यंदाच्या वर्षी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.