यंदा आषाढी वारीत प्रशासनाचे काटेकोर नियोजन; गर्दी नियंत्रणासाठी ‘वॉच टॉवर’सह करणार ‘AI’ चा वापर

0
116
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आषाढी वारीच्या पूर्वतयारीसाठी पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील प्रशासनाची बैठक अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या तीनही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच पालख्यांच्या संस्थानांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. यावेळी बैठकीत आषाढी वारीत होणाऱ्या गर्दीबाबतच्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यंदा पावसाचे प्रमाण पाहता, पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नियोजनामध्ये वाढ करण्यात येणार आहे. एकत्रित नियंत्रण कक्ष, पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग केला जाणार असून, त्यासाठी ‘वॉच टॉवर’ उभे केले जाणार आहेत. पंढरपूर आणि वाखरी येथे गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. एकात्मिक नियंत्रण कक्ष उभा करण्यात येणार असून, कक्षातील सर्व विभागांच्या प्रमुखांना वॉकी-टॉकी देण्यात येणार आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

यावेळी द्विवेदी म्हणाल्या, ‘गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्य मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच पालखी मार्गाला जोडल्या जाणाऱ्या कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, कामे सुरू असलेल्या ठिकाणचा रस्त्यांवरील राडारोडा उचलणे, मुरुमीकरण करणे आदी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

शौचालयासाठी घरांवर पांढरे झेंडे…

‘खासगी कुटुंबांनी वारकऱ्यांसाठी आपली शौचालये वापरास देण्याची इच्छा दर्शविली आहे. अशा घरांवर पांढरे झेंडे लावून पालखी सोहळ्यात माहिती देण्यात येणार आहे,’ असे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

हिरकणी कक्ष, मेडिकल किट…

जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माउली पालखीसाठी 1800, संत तुकाराम महाराज पालखीसाठी 1200, तर संत सोपानदेव महाराज पालखीसाठी 200 टैंकर्सची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.