आठवडी बाजाराच्या जागेवरून फलटणमधील 402 शेतकऱ्यांचे प्रशासनास निवेदन

0
192
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटणमधील ४०२ शेतकरी आणि मंडई विक्रेत्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे महत्वाची मागणी केली आहे. रविवारचा आठवडी बाजार माळजाई मंदिराच्या समोर आणि आणखी एका भागात बसवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी फलटण, फलटण नगरपरिषद आणि फलटण पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या निवेदनातील मागणीनुसार, आठवडी बाजार दोन भागांत बसवावा, माळजाई मंदिर ते गिरवी नाका आणि मेटकरी गल्ली ते उमाजी नाईक चौक ते गजानन चौक डेक्कन चौक या दोन भागात, नगरपरिषदेने चार आठवड्यांपूर्वी जुनी बाजारपेठ (रविवार पेठ) येथे प्रायोगिक तत्त्वावर बाजार बसवला होता. मात्र, या निर्णयामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीनंतर, मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद यांच्यासोबत एक बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आणि विक्रेत्यांचा आक्रोश लक्षात घेऊन ऐच्छिक धोरण ठेवण्यात आले.

त्यानुसार, रविवारचा आठवडी बाजार वरील दोन भागांत बसत आहे. शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मते, हा निर्णय त्यांच्यासाठी आणि फलटणमधील नागरिकांसाठी हिताचा आहे. म्हणूनच ४०२ स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन दिले आहे. फलटणमध्ये दर रविवारी भाजीमंडई बाजार भरतो, तसेच आठवडी बाजारही भरतो. शिवाय, दररोज सकाळी व संध्याकाळी ताजी मंडई भरते. शंकर मार्केट, महात्मा फुले भाजी मंडई, नागेश्वर मंदिर परिसर आणि शिवाजी चौक या ठिकाणीही भाजी मंडई भरते, असे निवेदनाद्वारे सांगितले आहे.