सातारा प्रतिनिधी । सध्या रब्बी हंगामातील ज्वारी पिके काढणीबरोबर मळणीची लगबग सुरू आहे. सातारा तालुक्यातील शिवारात ही कामे पूर्णत्वाला जाताना दिसत आहेत. काही ठिकाणी अद्यापही कामे सुरूच आहेत. भर उन्हात महिला शेतकरी काबाडकष्ट करून अन्नधान्याची तजबीज करून ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.
सध्या कडक उन्हाळ्यात शेतातील काम करताना उन्हाचे चटके बसत आहेत. भर उन्हात शेतकरी काबाडकष्ट करून अन्नधान्याची तजबीज करून ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. कुठे कडब्याच्या पेंड्या बांधण्यात येत आहेत, तर कुठे मळणी करून धान्याची रास लावली जात आहे. त्यामुळे शिवारात सकाळी व सायंकाळच्या सुमारासही कष्टाची कामे सुरूच आहेत. ज्वारीच्या पिकांची काढणी व मळणी उरकण्यावर शेतकर्यांचा कल दिसून येत आहे. ज्वारी, गहू काढण्याची सराईतील कामे वेगावलेली दिसत आहेत.
शेतकरी समुहाच्या सह्याने कामे उरकत आहेत. पाळीव जनावरांच्या चार्यासाठी ज्वारीच्या कडब्याला महत्त्व असल्याने तो ट्रॅक्टर व बैलगाडीच्या साह्याने घरी नेऊन गंजी लावून ठेवला जात आहे. ज्वारीचा कडबा बांधण्यासाठी चांगला दर मिळत असल्याने या कामात शेतकर्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सातारा तालुक्यात ज्वारी पिकाबरोबरच गहू, ऊस, आले व हळद ही पिके काही प्रमाणात घेतली जात आहेत. उन्हाचा चटका सोसत कष्टातून पिके काढली जात आहेत. कडक उष्णतेमुळे विशेषतः सकाळ व संध्याकाळी शेतीची कामे उरकण्यात येत आहेत. कामांमध्ये वेळ काढून शेतकरी व मजूर वर्ग मध्य भोजन एकत्रित करताना दिसत आहेत.