‘अजिंक्यतारा’ मशाल महोत्सवाने उजळला; लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत झाली पारंपरिक वाद्यं अन् शिवगर्जना

0
310
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात दरवर्षी शिवजयंती सोहळा मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यंदादेखील शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अवकाशात फडकणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांचा निनाद, हलगीचा कडकडाट, तेजोमय मशालींनी उजळून गेलेली तटबंदी अन् अंगावर शहारे आणणाऱ्या शिवगर्जना, अशा उत्साही वातावरणात किल्ले अजिंक्यताऱ्यावर मंगळवारी रात्री मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. यानंतर तुतारीचा निनाद व हलगीच्या कडकडाटात सर्व मावळे राजसदरेवर आले. याठिकाणी मान्यवरांचा सत्कार व मनोगत व्यक्त करण्यात आले. यानंतर मशाल महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी… जय शिवाजी, हर हर महादेव, अशा गगनभेदी घोषणाही देण्यात आल्या. किल्ल्याची तटबंदी मशालींच्या लखलखाटाने उजळून निघाली. या साेहळ्याला माजी पक्षप्रतोद अमोल मोहिते, राजू गोरे, धनंजय जांभळे, विकास गोसावी, हर्षल चिकने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव समितीकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. किल्ले अजिंक्यताऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार व बुरुजाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागोजागी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. डोळे दीपणारी विद्युत रोषणाई, फेटेधारी मावळे, मशालींचा लखलखाट अन् मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पाहून किल्ल्यावर शिवकाल अवतरला.