सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांत 81 टक्के पाणीसाठा; पहा कोणतं धरण किती भरलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील पाऊस गायब झाल्याने प्रमुख धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. सप्टेंबर महिन्यात धरण भरून पाणी सोडले, मात्र अजूनही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. सिंचनासाठी धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांतून २२५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात महाबळेश्वरला सर्वाधिक ६२ मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही 90 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण भरण्यासाठी अजून १४ टीएमसी पाण्याची गरज आहे.

पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे पिकांना फायदा होत आहे. त्याचबरोबर धरणातही पाण्याची सावकाशपणे आवक होत आहे. तरीही अनेक प्रमुख मोठी धरणे शंभर टक्के भरतील का? याविषयी साशंकता आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे २५ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजाला ३२ आणि महाबळेश्वरला ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करतात कोयनेला ३८३३ तर नवजा येथे ५५०६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वर येथे ५२५८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रातही पाऊस पडतोय. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ७४८३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ९०.४६ टीएमसी झाला होता. गेल्या काही दिवसापासून धरणातून पाणी विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.