Historical Places : सातारा जिल्ह्यातील 6 प्रसिद्ध अशा ऐतिहासिक किल्ल्यांना नक्की भेट द्या; आहेत खूप खास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाळा ऋतू असल्याने आठवड्यातील शनिवार आणि रविवार हा आला कि पर्यटक पर्यटनाच्या ठिकाणी हजेरी लावू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातही अशी पर्यटनाची काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतायत. सातारा जिल्हा हा निसर्गरम्यतेने नटलेला आहे. या याठिकाणी अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत कि त्या ठिकाणी तुम्ही एका दिवसात भेटी देऊ शकतात. साताऱ्यातील अशी सहा ऐतिहासिक किल्ले आहेत की या ठिकाणी तुम्ही भेटी दिल्यानंतर तुम्हाला ऐतिहासिक माहितीसह निसर्गाचा आनंद जाणून घेता येईल. अशा साताऱ्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांची माहिती आज आपण पाहणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या सातारा भागातील घराघरांत छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाते. सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. राजवाडा, संग्रहालये, पठार, महाबळेश्वर सारखे पर्यटन स्थळ, धबधबे अशा विपुल खजिन्यांनी सातारा नटला आहे. ऐतिहासिक वारसा सोबत सातारा जिल्ह्याला सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा देखील लाभला आहे. निसर्गाने भरलेला, डोंगररांगांनी वेढलेला, नद्यांनी समृद्ध असलेला सातारा जिल्हा प्राचीन गड किल्ल्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. हे गडकिल्ले म्हणजे अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत.

सातारा शहर पश्चिम महाराष्ट्रात येते. सातारा शहराची स्थापना पहिले शाहू महाराज यांनी १६ व्या शतकात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. चहू बाजुंनी या शहराला सात पर्वतांनी वेढल्यामुळे या शहरास सातारा नाव पडले.

WhatsApp Image 2024 06 23 at 6.31.29 PM

1) अजिंक्यतारा किल्ला (Ajinkyatara Fort)

साताऱ्याचा किल्ला म्हणून अजिंक्यतारा प्रसिद्ध आहे.सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला हा मोठा किल्ला मंगळाईचा डोंगर म्हणून देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशीच सातारा शहर वसले आहे. सातारा पासून किल्ल्याची उंची ९०० फूट आहे. लांबी व रुंदी अनुक्रमे ३५००×२००० फूट आहे. या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत त्यापैकी महाद्वार उत्तर दिशेला आहे व दुसरा दरवाजा दक्षिण दिशेला आहे. येथील तटाची उंची साधारण १५ फूट असून रुंदी १० फूट आहे.

अजिंक्यतारा गडावर महादेव मंदिर, हनुमान मंदिर, मंगळा देवीचे मंदिर आहे. गडावर सहा तलाव व ताराराणी यांचा महाल आहे. पूर्ण गड फिरण्यास जवळपास दीड तास लागतो. अजिंक्यतारा किल्ला ११९० मध्ये शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज यांनी बांधला. १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. असा हा भव्य दिव्य अजिंक्यतारा आजही सातारा जिल्ह्याची शान आहे. गिर्यारोहक व पर्यटक, ट्रेकिंगची आवड असणारे सातारा जिल्ह्यातीळ अजिंक्यतारा बघायला आवर्जून येतात.

WhatsApp Image 2024 06 23 at 6.39.10 PM

2) सज्जनगड किल्ला (Sajjangarh Fort)

समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा कडून जिंकून घेतला. सातारा जिल्ह्यापासून दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी नदीच्या खोऱ्यात हा सज्जनगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यावर समर्थ रामदास स्वामींनी तिथे राहण्याची विनंती केली व समर्थांनी ती मान्य केली. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव वसलेले असल्यामुळे याला परळीचा किल्ला म्हणूनही ओळखतात. परळी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी जायला जवळपास ७५० पायऱ्या समर्थ मंडळाने बांधल्या आहेत. सातारा परळी रस्त्यावर गजवडी गाव आहे तिथून सज्जनगडला जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे व येथून १०० पायऱ्या चढाव्या लागतात.

सज्जनगडला जाताना वाटेवर समर्थांनी स्थापन केलेली ११ मारुतीची छोटी मंदिरे आढळतात शिवाय मारुतीचे मंदिर, अंगलाई देवीचे मंदिर देखील गडावर आहे. येथील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचा मठ, संस्थान, श्रीराम मंदिर व शेजघर. मठात व शेजघरात समर्थ रामदास स्वामी यांच्या वापरातील सर्व वस्तू पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वामी समर्थाना दिलेला पलंग, स्वामी समर्थांचा पाणी पिण्याचा तांब्या, कुबडी, हंडे, गुप्ती, पानाचा डबा अशा बऱ्याच वस्तूंचे जतन केलेले दिसते. समर्थ रामदास स्वामी यांचे संस्थान, मठ, कार्यालय यातर्फे आजही गडावर विविध उपक्रम राबवले जातात. गडावर स्वछता असते व गडाचे आणि रामदास स्वामींच्या आध्यात्मिक वारशाचे पावित्र्य जपले जाते. पावसाळ्यात किंवा पावसाळा झाल्यावर इथल्या मोहक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गडाला नक्की भेट द्यावी.

Pratapgarh Fort

3) प्रतापगड किल्ला (Pratapgarh Fort)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील व स्वतंत्र स्वराज्याच्या लढाईतील एक महत्वपूर्ण घटना म्हणजे अफझलखानाचा वध. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच्या सैन्याचा धुरळा उडाला तो या प्रतापगडावरच. महाबळेश्वरच्या पश्चिमेला आठ मैलावर प्रतापगड १६५६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची 3543 फूट आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 7545 चौरस मीटर असून, 3600 चौरस मीटर बालेकिल्ला आणि 3885 चौरस मीटर मुख्य किल्ला आहे.

मुख्य किल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग पडतात. प्रशस्त गडावर तुळजाभवानी मातेचे सुंदर मंदिर आहे. प्रतापगडावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पाच फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच गडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर आहे ती जागा दर्गाशाही म्हणून ओळखली जाते. ऐतिहासिक घटनेने स्वराज्याचा पाया मजबूत केलेल्या प्रतापगडावर पर्यटकांची वर्दळ नेहमीच आढळून येते. सातारा जिल्ह्यात प्रतापगड असल्याचा नेहमीच अभिमान आहे.

Vasota Fort 2

4) वासोटा किल्ला (Vasota Fort)

सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलामधील एक अनोखं दुर्गरत्न म्हणजे घनदाट जंगलातला वासोटा किल्ला होय. जावळीच्या जंगलात वसलेला हा वासोटा किल्ला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुरुंग म्हणून प्रसिद्ध होता. याचे कारण म्हणजे याच्या आजूबाजूला असलेलं घनदाट जंगल व जंगलात आढळणारी वन्य श्वापदे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला असा हा वासोटा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखं दुर्गरत्‍न आहे. वासोटा किल्ला ज्या डोंगरावर आहे तिथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने आपल्या गुरूच्या नावावर वसिष्ठ असं ठेवलं असेल अशी आख्यायिका आहे.

कालांतराने याचं नाव वासोटा असं पडलं असावं असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं. शिवसागर जलाशय, नागेश्वर शिखर, पलीकडे दिसणारे ठोसेघर, पवनचक्क्या असे निसर्ग सौंदर्य वासोटा किल्ल्यावरून न्याहाळता येते. बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो. तिथून वनखात्याच्या चेकपोस्टपासून चढाई करत दोन तासांत तुम्ही वासोट्याच्या माथ्यावर पोहोचता. हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलाने वेढलेला आहे.

dffd6cb7 ceef 4889 ba1e 368f81f5f2b5

5) कमळगड किल्ला (Kamalgarh Fort)

कमळगड हा डोंगरी किल्ला सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या परिसरात आहे. कमलगडची उंची अंदाजे ४००० फुटांपेक्षा अधिक आहे. डोंगरी किल्ल्यांपैकी सर्वात मोठा डोंगरी किल्ला म्हणून कमळगड ओळखला जातो. कमळगडावर कावेची विहीर आहे. या गडावर गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. या गडाच्या उत्तरेला धोम धरण, केंजळगड व रायरेश्वर मंदिर आहे. या गडाला बाजूला डोंगररांगा जोडल्या आहेत त्याला इथे नवरानवरी डोंगर म्हणतात. दक्षिणेला कृष्णा नदीच्या खोरे व उत्तरेला वाळकी नदीचे खोरे यांच्या मध्ये कमळगड अगदी दिमाखात उभा आहे.

सौंदर्याने निसर्गाच्या जंगलात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून उभा असलेला परिपूर्ण असा कमळगड ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम आहे. धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली आहे . दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा असलेल्या या डोंगररांगेतून काळ्या पाषाणाचा एक डोंगर मान वर काढून आल्यासारखा उंचावला आहे. त्याचे नाव आहे ‘कमळगड ‘. रुढार्थाने सर्व किल्ल्यांवर असणारी तट – बुरूज असे कोणतेच अवशेष या किल्ल्यावर नाहीत . पण या सर्वांहून न्यारा असा टवटवीत निसर्गाचा अमाप खजिना कमळगडास लाभला आहे.

Vairatgarh Fort

6) वैराटगड किल्ला (Vairatgarh Fort)

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. वैराट गड हा वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून 8 कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला एका दिवसात पाहून येऊ शकतो. 3 हजार 340 फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पायथ्याच्या गावापर्यंत जाणाऱ्या बसेस व इतर गाड्या यामुळे या परिसरातील भटकंती फारच सोपी आहे. वैराटगड हा शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता.

शिवरायांनी जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे 1818 मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कड्याच्या खालच्या बाजूस पाच ते सहा टाकी आहेत. उजव्या बाजूस छोटी गुहा आहे. साधारणतः 20 ते 25 पायऱ्या चढून गडावर पोहचता येते. डाव्या हातालाच मारुतीचे मंदिर आहे. तर मंदिराबाहेर सुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे. आजुबाजूला काही प्रमाणात चौथरे दिसतात.