तृणधान्य महोत्सवात 22 लाखांची उलाढाल; सातारकरांनी बाजरी, ज्वारी, तांदळाची केली खरेदी

0
253
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या पौष्टिक तृणधान्य महोत्सवात नागरिकांनी सुमारे २२ लाख रुपयांची खरेदी केली, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली. दरम्यान, या महोत्सवात सातारकरांनी माण तालुक्यातील देशी बाजरी, खटावची ज्वारी, जावळी-पाटणच्या तांदळाची भरभरून खरेदी केली.

येथील पोलिस करमणूक केंद्रात पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवण्याबरोबरच विक्री कौशल्य विकसित करून थेट माल विक्रीद्वारे जास्तीत जास्त नफा मिळविणे तसेच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल मिळणे, पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्त्व माहीत होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातील तीन दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची ग्राहकांनी खरेदी केली.

महोत्सवात सातारा जिल्ह्यातून तब्बल 61 स्टॉल

महोत्सवात एकूण ६१ स्टॉल होते. माण आणि खंडाळा तालुक्यातील देशी बाजरी, सातारा तसेच खटावची देशी ज्वारी, कहऱ्हाडची नाचणी, जावळी आणि पाटण तालुक्यातील इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मूग, कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील ‘ हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे विक्रीस होती. तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ, वैशिष्ट्य पूर्ण व दर्जेदार उत्पादने ग्राहकांना खरेदी करता आली. या माध्यमातून ३ दिवसांमध्ये २२ लाखांपर्यंत विविध शेतमालाची विक्री झाली. या महोत्सवाला सातारकरांचा मोठा प्रतिसाद लाभला.