‘विकसित भारत संकल्प’ यात्रेला सातारा जिल्ह्यातील 20 हजार नागरिकांनी दिली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत संकल्प यात्रेला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अंतर्गत आजपर्यंत विविध तालुक्यातील ग्रामपंचायतीत घेतलेल्या कार्यक्रमात 19 हजार 975 नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये 10 हजार 346 पुरुष व 9 हजार 545 महिलांचा समावेश आहे.

या चित्र रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. यात्रे दरम्यान 14 हजार 202 नागरिकांनी संकल्प प्रतिज्ञा घेतली.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान कार्यक्रम झालेल्या गावांमध्ये उज्वला योजनेचा 272 जाणांना लाभ देण्यात आला. तसेच 1 हजार 73 नागरिकांना सुरक्षा विमा, 569 जणांना जीवनज्योती विमा, 5 हजार 35 नागरिकांची आरोग्य तपासणी, 2 हजार 345 नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात आली.

संबंधित गावांमधील 240 खेळाडू, 1 हजार 537 विद्यार्थी, 135 स्थानिक कलाकार आणि 1 हजार 858 महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. जिल्ह्यात ओडीएफ प्लस 86 गावे असून त्यापैकी 43 गावांना अभिनंदन पत्र देण्यात आले. सेंद्रीय शेती करणाऱ्या 65 शेतकऱ्यांशीही या यात्रेदरम्यान संवाद साधण्यात आला, असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यावतीने देण्यात आली.