सातारा प्रतिनिधी । कायमस्वरूपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरू आहे. योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील १ हजार ८९३ ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन नव्याने वीजजोडणी घेतली आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व बिगरशेती वीज ग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेली अभय योजना दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू आहे. थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सूट मिळत आहे.
यासोबतच मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने जोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून, थकबाकीमुक्तीसाठी वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नव्याने वीजजोडणी…
बारामती परिमंडलात २ लाख ७७ हजार ४७२ ग्राहक अभय योजनेसाठी पात्र होते. यामध्ये सातारा मंडलातील ५४ हजार ८९६ ग्राहकांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील १ हजार ८९३ ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेत २ कोटी ३५ लाखांचा भरणा करून नव्याने वीज जोडणी घेतली.