सातारा प्रतिनिधी | गरीब, मजूर, शेतकरी, बेघर आणि कष्टकऱ्यांना स्वस्त दरात पौष्टिक जेवण उपलब्ध करून७ देण्याच्या उद्देशाने “शिवभोजन थाळी” योजना सुरू करण्यात आली होती. पूर्वी सातारा जिल्ह्यात साधारणतः २० केंद्रे होती, त्यापैकी आता केवळ १७ सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत थाळ्यांचे वाटप पाच ते सात टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षीपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण २० केंद्रे सुरू होती, परंतु त्यातील तीन केंद्रे बंद पडली आहेत. आता नोंदणीकृत १७ केंद्रे असली तरी रोजच्या थाळ्यांत पाच ते सात टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. सातारा जिल्ह्यात शिवभोजन थाळ्यांचे २०२४ मध्ये ५ लाख १२ हजार ३३७ थाळ्यांचे वाटप झाले. तुलनेत २०२५ वर्षात ३० एप्रिलअखेर चार महिन्यात फक्त १ लाख ५७ हजार ७०१ थाळ्यांचे वाटप झाले आहे. शिवभोजन केंद्रे कमी झाल्यानंतर नवीन केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या वर्षभरात अवघा एक अर्ज आला होता. शासनाकडून शिवभोजन केंद्र वाढण्यासाठी चांगले अनुदान आणि योजनेचा प्रसार करण्याची गरज आहे.
तत्कालीन मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी गरिबांसाठी अल्प दरात शिवभोजन थाळी सुरु केली होती. हि योजना आजही सुरु आहे. मात्र राज्यभरातील शिव भोजन थाळी संचालकांना मागील सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटी रुपये थकलेले असल्याचे सांगण्यात येत असून अनुदान न मिळाल्यामुळे शिवभोजन थाळी संचालक अडचणी सापडले आहेत.
आजच्या महागाईत गरिब मजूर, कामगारांना कमी दरात भोजन मिळावं, यासाठी १० रुपयात भोजन देण्याची योजना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरु करण्यात आली होती. हि योजना पुढे महायुती सरकारच्या काळात देखील सुरु ठेवण्यात आली आहे. अर्थात यासाठी ठिकठिकाणी सुरु करण्यात आलेला शिवभोजन थाळी केंद्र चालकांना सरकारकडून अनुदान स्वरूपात रक्कम दिली जात होती. मात्र आता हि अनुदानाची रक्कम केंद्र चालकांना मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यभरात जवळपास ५ हजार शिवभजन थाळी केंद्र
राज्यभरात जवळपास ५ हजार शिवभजन थाळी केंद्र आहेत. कोणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयात जेवण देण्याची योजना राज्यात राबवली जात आहे. मात्र जानेवारी महिन्यापासून केंद्र चालकांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. अर्थात पैसे न मिळाल्यामुळे आता शिवभजन थाळी कशी चालवायची असा प्रश्न संचालकांना पडला आहे.