सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील डोळेगाव येथे उसाच्या क्षेत्राला आग लागून तब्बल 9 शेतकऱ्यांचा 16 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना महावितरणच्या पवनचक्कीच्या विद्युत वाहिनीमुळे आज यामध्ये घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महावितरणच्या पवनचक्कीच्या विद्युत वाहिनीमुळे सातारा तालुक्यातील डोळेगाव येथे उसाच्या क्षेत्राला आग लागली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
ऊसाचे क्षेत्र सलग लागून असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. ऐन ऊस तोडणी हंगामाच्या तोंडावरच ही घटना घडली आहे. तोडणीला आलेला इतक्या मोठ्या प्रमाणातील क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान प्रशासनाकडून याचा पंचनामा झाला असून तातडीने मदत दिली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.