साताऱ्यात 22 वर्षांनी होणार विद्रोही साहित्य संमेलन

0
261
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचे १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन साताऱ्यात होणार आहे. २२ वर्षांनी पुन्हा हे संमेलन साताऱ्यात होत आहे. हे संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील आणि साताऱ्याच्या प्रतिसरकारला समर्पित करण्यात आलेले आहे, अशी माहिती अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी दिली.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात संमेलन घेण्याचे ठरले आहे. सातारा येथे यापूर्वी २००२ मध्ये ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात संमेलन होणार आहे. साताऱ्याच्या प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. साताऱ्याचे प्रतिसरकार हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला यांना सोबत घेऊन जाणारे होते. त्यांच्या उत्कर्षाचं काम करणारे होते. त्यांनी केवळ घोषणा केल्या नाहीत तर गरिबातील गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीनं भूमिका घेऊन सातत्यानं कार्य केले. म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ साताऱ्याच्या प्रतिसरकारला महत्त्व देते. त्यासाठीच साताऱ्याला होणारे नियोजित १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील व प्रतिसरकारला समर्पित करत आहे.

या संमेलनात लोकसाहित्य आणि साताऱ्याचे प्रतिसरकार, वारकरी आणि साताऱ्याचे प्रतिसरकार, साहित्यातील महिलांच्या प्रतिमा व विद्रोही साहित्य, स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र लढ्यात साहित्यिक आणि कलावंतांचे योगदान, आदिवासींचे सशस्त्र लढे व स्वातंत्र्य चळवळ, भारतीय संविधानाची ७५ वर्षे या अनुषंगानं चर्चासत्रे, परिसंवाद तसेच विद्रोही शाहिरी जलसा, कवी संमेलन होणार आहेत, अशी माहितीही प्रवक्ते अविनाश कदम आणि विजय मांडके यांनी दिली.

दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅड. सुभाष पाटील, व्ही. वाय पाटील, प्रसेनजीत गायकवाड, कॉ. शिवराम सुकी, कॉ. अशोक जाधव, हभप डॉ. सुहास फडतरे, डॉ. बापू चंदनशिवे, प्रा. दिनकर दळवी, प्रा. सुधीर अनवले, ज्योती आदाटे, ॲड. सरफराज बागवान, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा. सीमा मुसळे, शिवराम ठवरे, राहुल गंगावणे, शुभम ढाले आदी संमेलन यशस्वी होण्यासाठी सक्रीय झाले आहेत.