सातारा प्रतिनिधी । आपण लावलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी राज्य शासनाने पीक विमा योजना सुरू केली आहे. आताच्या रब्बी हंगामासाठीही एक रुपया भरुन सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. कारण नुकसानीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्याला ज्वारीसाठी हेक्टरी २६ तर गव्हासाठी ३० हजारांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे साडे आठ हजार शेतकऱ्यांनी एक रुपये भरून या पीक योजनेत सहभाग घेतला आहे.
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, दुष्काळ आदींने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरु केली आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरविण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागत होती. पण, मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. याचा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
रब्बी हंगामातीळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सुरु केलेल्यापीक विमा योजनेत एक रुपया भरून शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य आणि केंद्र शासन भरणार आहे. यंदाच्या हंगामात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ही योजना लागू आहे.
या तारखेपर्यंत विमा नोंदणीची मुदत
जिल्ह्यात ठराविक पिकांसाठी ही योजना आहे. यासाठी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत तर गहू, हरभरा आणि कांद्यासाठी १५ डिसेंबर तसेच उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत पीकविमा योजनेत सहभाग घेता येणार आहे.
पीकविमा संरक्षित रक्कम हेक्टरी रुपयात
ज्वारी बागायत : २६,०००
ज्वारी जिरायत : २०,०००
गहू : ३०,०००
हरभरा : १९,०००
कांदा : ४६,०००
भुईमूग : ४०,०००