मुख्यमंत्री शिंदेंच्या सातारा जिल्हा प्रमुखाचे फडणवीसांना साकडे; थेट केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते व सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच एक महत्वाची मागणी केली. खंडाळा तालुका वाढत्या औद्योगीकरणाला विजेचा अपुरा पुरवठा अडथळा ठरला आहे. यावर तोडगा काढून भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी जाधव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. यावर फडणवीसांनी देखील हा विषय गांभीर्याने घेत महावितरणला तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात जाधव यांनी म्हटलंय की, खंडाळा तालुक्यातील वीजप्रश्नासाठी भरीव तरतुदीच्या प्रमुख मागणीसह जेजुरी येथील अर्धवट दोन टॉवरचे काम लवकर मार्गी लावावे जेणेकरून शिरवळ उपकेंद्र लोणंदला जोडण्यात येईल. शिरवळ येथील 132 के.वी. उपकेंद्रामध्ये तातडीने आयसोलेटर बसवणे.

शिरवळ (ता. खंडाळा) येथील 132 के.वी. उपकेंद्रामधील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे या कामांचा पाठपुरावा पुरुषोत्तम जाधवांकडून करण्यात आला आहे. वीजप्रश्नावर पुरुषोत्तम जाधव म्हणाले, खंडाळा तालुक्यामध्ये नुकतेच धोम बलकवडी व निरा देवधर या प्रकल्पाचे पाणी आल्याने आता कुठे कृषी क्षेत्रामध्ये बळीराजाची प्रगती चालू झाली आहे.

मात्र, महावितरणकडून विजेबाबत चाललेल्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची अवस्था पुरती गोंधळलेली आहे. शेतीला दिवसा वीज असो किंवा रात्री त्यातही अर्धवेळ बऱ्याचदा वीज गेलेलीच असते. वास्तविक पाहता शेतीसाठी लागणारी वीज हा बळीराजासाठी अतिमहत्त्वाचा प्रश्न असून, महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका संपूर्ण शेतकरी वर्ग सोसत आहे.

हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, तसेच या कामांसोबतच खंडाळ्याच्या पश्चिम भागातील 14 गावांसाठी सध्या 22 के.वी जवळे गावठाण ही एकच वाहिनी असून, या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास परिसरातील १४ गावे बाधित होतात.

त्यामुळे लोहम या ठिकाणी 33/22 के.वी. क्षमतेचे उपकेंद्र केंद्र सरकारच्या योजनेमध्ये प्रस्तावित असून, सदर उपकेंद्रास तातडीने मंजुरी मिळावी. तसेच म्हावशी उपकेंद्रातील पाच एम. व्ही.ए. रोहित्राचा १० एम.व्ही.ए. करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे. यावर फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घेत महावितरणला तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खंडाळा तालुक्यातील विजेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.